धाराशिव लाईव्हचा निर्भीड प्रवास: ३५ वर्षांच्या पत्रकारितेचा अनुभव

 


गेल्या ३५ वर्षांत पत्रकारितेच्या क्षेत्रात मी अनेक चढउतार पाहिले. या प्रवासात माध्यमात खूप बदल झाले. सुरुवातीला फक्त प्रिंट मीडियाचा जमाना होता, नंतर टीव्ही माध्यम उदयास आले, आणि आता डिजिटल मीडियाने एक नवा अध्याय लिहिला आहे. या सर्व बदलांचा मी साक्षीदार आहे आणि त्यांच्या विविध पैलूंचा अनुभव घेतला आहे.


धाराशिव जिल्ह्यात प्रतिनिधी म्हणून काम करत असताना, १३ वर्षांपूर्वी मी स्वतःचे डिजिटल चॅनल सुरू करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयातूनच 'धाराशिव लाईव्ह' या डिजिटल चॅनलचा जन्म झाला. आज धाराशिव लाईव्ह केवळ धाराशिव जिल्ह्यापुरते मर्यादित नाही, तर जगभरात लाखो वाचकांच्या संपर्कात आहे. वेबसाइट, यूट्यूब चॅनल, आणि फेसबुक पेजच्या माध्यमातून धाराशिव लाईव्हने एक मजबूत डिजिटल उपस्थिती निर्माण केली आहे. या लोकप्रियतेमुळे धाराशिव लाईव्ह आज धाराशिव जिल्ह्यातील नंबर १ डिजिटल चॅनल बनले आहे.


धाराशिव लाईव्हवर प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या नेहमीच आगळ्यावेगळ्या असतात. त्यात कोणत्याही प्रकारची कॉपीपेस्ट नाही. माझ्या लिखाणाची शैली बेधडक, निर्भीड आणि आक्रमक आहे. कोणताही बडा राजकीय नेता असो किंवा उच्चपदस्थ अधिकारी, चुकीला माफी नाही, ही माझी कामाची नीती आहे. माझा संघर्ष कोणत्याही व्यक्तीविरुद्ध नसून चुकीच्या प्रवृत्तींविरुद्ध आहे. त्यामुळेच मी भ्रष्ट किंवा लाचार पत्रकारांच्या विरोधातही बातम्या देतो.


आठ वर्षांपूर्वी मला धाराशिव सोडून पुण्यात स्थलांतर करावे लागले. परंतु, धाराशिवशी माझे नाते कधीच तुटले नाही. धाराशिव हीच माझी जन्मभूमी आणि कर्मभूमी आहे. पुण्यात राहूनही मी धाराशिव लाईव्हचे काम चालवतो. माझा नियमित दौरा २५ दिवस पुण्यात आणि ५ दिवस धाराशिवमध्ये असतो. काही लोक मला विचारतात, "आम्हाला धाराशिवमध्ये राहूनही बातम्या कळत नाहीत, मग तुम्हाला पुण्यात राहून कशा कळतात?" यावर माझे एकच उत्तर असते - सोर्स. मी कधीच माझ्या सोर्सचे नाव उघड करत नाही, आणि बातमी दाबण्याचा विचारही करत नाही.


विशेषत: पोलीस किंवा महसूल अधिकाऱ्यांविरुद्ध आलेल्या बातम्यांबाबत लोकांचा मोठा प्रतिसाद असतो. मी कधीच गोरगरीबांवर होणारा अन्याय खपवून घेत नाही. त्यांच्या समस्या घेऊन लढण्याचा माझा ध्यास आहे. या लढ्यामुळे माझ्यावर आजवर चार खोट्या खटल्यांचा सामना करावा लागला, परंतु जनतेच्या आशीर्वादाने मी त्या सर्वांमधून निर्दोष सुटलो.


माझा हा लढा पुढेही चालूच राहील. मी न भिता, न घाबरता माझ्या कार्यात पुढे जात राहीन. कोणतीही बातमी दबली जाणार नाही,याची मला खात्री आहे. माझा प्रवास हा सत्याच्या शोधाचा आहे, आणि या मार्गावर मी ठामपणे उभा राहणार आहे.धाराशिव लाईव्हचे यश हे लोकांच्या विश्वासावर आणि माझ्या निर्भीड पत्रकारितेच्या तत्वांवर आधारित आहे.

- सुनील ढेपे, संपादक, धाराशिव लाइव्ह 


पत्रकारिता : धर्म की धंदा?

 


पत्रकारितेच्या क्षेत्रात ३५ वर्षे कार्यरत असलेल्या माझ्या अनुभवातून एक गोष्ट स्पष्ट झाली आहे - पत्रकारिता हा धर्म आहे, धंदा नाही. अनेक लोक पत्रकारितेत केवळ पैसा आणि प्रतिष्ठा कमावण्यासाठी येतात, पण मला नेहमीच पत्रकारितेचा मूळ धर्म जोपासणं महत्त्वाचं वाटलं आहे. माझ्या कामामधून मी समाजातील दुर्बल आणि गोरगरिबांची सेवा केली, त्यांचं प्रतिनिधित्व केलं. धनसंपत्ती मात्र काहीही कमावलं नाही. यामुळे अनेकदा लोक मला विचारतात, "अरे, किती वर्षं काम केलं, पण काय मिळवलं?" त्यांच्या प्रश्नात तोच उपहास असतो - काही पत्रकार मोठमोठे बंगले, गाड्या आणि संपत्ती जमा करतात, तर तुम्ही का नाही?


माझ्या समोर अनेक उदाहरणं आहेत, जिथे काही पत्रकार स्वतःचा स्वार्थ साधत, नीतिमूल्यांशी तडजोड करून धनसंपत्ती गोळा करतात. पण मी मात्र नेहमी या गोष्टींपासून दूर राहिलो. मला माझं काम सामाजिक सेवेसारखं वाटतं. पैसा मिळवण्यासाठी मी कधीही पत्रकारितेला व्यवसायाच्या दृष्टिकोनातून पाहिलं नाही.


१५ वर्षांपूर्वी धाराशिवमध्ये मी कर्ज काढून एक छोटासा १ BHK फ्लॅट घेतला होता. त्या वेळेस आर्थिक स्थैर्य नव्हतं, पण मेहनतीने आणि कर्ज फेडून अखेर तो फ्लॅट कर्जमुक्त केला. धाराशिवमध्ये माझं घर असावं, हे मला कायमच अभिमानास्पद वाटत होतं. मात्र, आठ वर्षांपूर्वी एका खोट्या केसमुळे मला धाराशिव सोडून पुण्यात येणं भाग पडलं. तेव्हापासून धाराशिवचा फ्लॅट तसाच रिकामा आहे; न तो विकला, न भाड्याने दिला.


काही जवळचे मित्र सल्ला देतात की, "धाराशिवचा फ्लॅट विकून टाक आणि पुण्यात फ्लॅट घे." काहीजण म्हणतात, "फ्लॅट भाड्याने दे, आणि पुण्यातील घराचं भाडं भर." पण यावर माझं विचारमंथन सुरू असतं. धाराशिवच्या फ्लॅटची किंमत आणि पुण्यातील घरांच्या किमतीत प्रचंड फरक आहे. धाराशिवचा फ्लॅट विकला तरी पुण्यात योग्य घर घेणं मला सोपं नाही. शिवाय, धाराशिवला कामानिमित्त गेलो तर राहायला कुठे? हा प्रश्न कायमचा आहे.


माझं मन म्हणतं की, धाराशिवशी असलेलं नातं मी असं तोडू शकत नाही. माझं जीवन इथं घडलं, इथल्या मातीशी माझं नातं आहे. तो फ्लॅट माझ्या संघर्षाचं प्रतीक आहे, आणि त्याचं मोल धनामध्ये मोजता येत नाही. म्हणूनच, तो फ्लॅट विकणं किंवा भाड्याने देणं मला योग्य वाटत नाही. शेवटी, पैसा सर्वस्व नाही; माणसाच्या मूल्यांशी, त्याच्या नात्यांशी त्याचं जीवन बांधलेलं असतं. पत्रकारितेतही हेच सत्य आहे - पैसा येतो आणि जातो, पण नीतिमूल्ये, समाजाची सेवा आणि आपलं आत्मसंतोष हेच खरे मूल्य आहेत.

- सुनील ढेपे 

दुसऱ्या लग्नाची पहिली गोष्ट

 


पत्रकारिता हे एक असं क्षेत्र आहे, ज्यामध्ये सत्याची पूजा केली जाते. गेले ३५ वर्षे मी या क्षेत्रात कार्यरत आहे, आणि या काळात मी कधीच सत्यापासून माघार घेतली नाही. निर्भीडपणे आणि निष्पक्षपणे जनतेच्या बाजूने उभं राहून मी बातम्या दिल्या, पण यामुळे अनेकदा माझ्यावर संकटं आली. खोट्या केसेस दाखल करण्यात आल्या, हल्ले झाले, धमकावलं गेलं, पण मी कधीच डगमगलो नाही. पत्रकारिता ही माझी ध्येयवेडी आवड आहे, आणि त्यासाठी मी अनेक आव्हानांचा सामना केला.परंतु, कुटुंबावर आलेलं संकट मात्र यापेक्षा मोठं होतं. माझं कुटुंब हेच माझं आधारस्तंभ होतं, आणि या आधारस्तंभाचं खचणं ही माझ्यासाठी एक कठीण परीक्षा होती.


माझं आयुष्य सुरुवातीपासूनच संघर्षमय होतं. मी ३० वर्षांचा असताना माझ्या आईचं निधन झालं. आई माझ्यासाठी खूप महत्त्वाची होती, तिच्या जाण्याने माझं आयुष्य रिकामं झालं. आईचा आजारपणानंतरचा कालावधी खूप कठीण होता. आईची प्रकृती बिघडत होती, आणि तिच्या आजारपणाचा प्रभाव कुटुंबावर दिसत होता. शेवटी ती आम्हाला सोडून गेली. तिच्या निधनानंतर काही वर्षांनी माझ्या वडिलांचं अपघातात निधन झालं. वडिलांच्या जाण्याने मला मोठा धक्का बसला. आई-वडिलांच्या निधनाने मी मानसिक दृष्ट्या खचलो, परंतु माझ्या पत्नीने मला त्या काळात मोठा आधार दिला.


माझ्या जीवनातला सर्वात मोठा आघात माझ्या पत्नीच्या आजारपणामुळे आला. सन २०१० मध्ये, माझ्या पत्नीला ब्रेस्ट कॅन्सर झाल्याचं तपासणीत लक्षात आलं. ही बातमी आमच्यासाठी धक्कादायक होती. बार्शीच्या कॅन्सर हॉस्पिटलमध्ये तिच्यावर उपचार केले गेले, आणि ती काही काळानंतर ठणठणीत झाली. आम्ही सगळे खूप आनंदी होतो. मात्र, या आनंदाचा काळ कमी ठरला. काही महिन्यांनंतर तिच्या मेंदूवर तीन गाठी आल्याचं समजलं. या गाठींचा परिणाम खूप गंभीर होता. धाराशिवमध्ये एमआरआय स्कॅनची सोय नव्हती, त्यामुळे आम्ही अनेक डॉक्टरांना दाखवूनही काहीच फायदा झाला नाही. अखेर, तिच्या प्रकृतीचा विचार करून आम्ही तिला सोलापूरच्या अश्विनी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. तिथे तिच्यावर उपचार झाले, पण नियतीने घाला घातला आणि १ मार्च २०१२ रोजी माझी पत्नी महानंदा हिचं निधन झालं.


पत्नीचं निधन माझ्यासाठी एक मोठं संकट होतं. माझा मुलगा गणेश त्या वेळी फक्त सात वर्षांचा होता आणि दुसरीत शिकत होता. माझी मुलगी मयुरी त्या वेळी छत्रपती संभाजीनगरमध्ये इंजिनियरिंगच्या प्रथम वर्षाला होती. पत्नीच्या जाण्यानंतर घराची जबाबदारी एकट्याने सांभाळणं खूप कठीण होतं. स्वयंपाक करण्याचं ज्ञान नव्हतं, त्यामुळे आम्ही खानावळीमधून डबा मागवत होतो. पण ते जेवण अत्यंत बेचव होतं. मुलाच्या शाळेत जाण्यासाठी त्याला बिस्किटं देत असे, आणि एकेदिवशी त्याने विचारलं, "पप्पा, मला किती दिवस बिस्कीट पुडा देणार आहात?" त्याचं हे बोलणं ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आलं.


दुसरं लग्न करण्याचा विचार मनात आला, पण काही मित्रांनी सांगितलं की सावत्र आई चांगली नसते. त्यामुळे मी थोडा संभ्रमात पडलो. मात्र, एका बड्या अधिकाऱ्याच्या आईने मला सल्ला दिला, "सुनील, तू दुसरं लग्न कर, लोक काहीही म्हणतील, पण मुलांना एक आई मिळेल." तिच्या या सल्ल्यानंतर मी निर्णय घेतला की मुलांसाठी दुसरं लग्न करावं. मला बायको हवी नव्हती, पण मुलांना यशोदा हवी होती. त्यानुसार, पुण्यातील एका माजी सैनिकांच्या मुलीशी मी विवाह केला.


माझं दुसरं लग्न झाल्यानंतर जीवन स्थिर झालं. मुलांची काळजी व्यवस्थित घेतली गेली. मयुरीचं लग्न झालं, आणि गणेश आता इंजिनियरिंग महाविद्यालयात शिकतोय . आम्ही पुण्यात स्थायिक झालो, आणि या नवीन जीवनात आम्ही सुखी आहोत. जीवनाच्या या प्रवासात आलेल्या संकटांवर मात करत मी आणि माझं कुटुंब पुढे गेलं आहे.


जीवनाच्या या प्रवासात मला अनेक आव्हानांचा सामना करावा लागला, पण प्रत्येक वेळी मी संघर्ष करत उभा राहिलो. माझ्या पत्रकारितेच्या प्रवासात मी कधीच सत्य आणि न्याय सोडला नाही, आणि कुटुंबाच्या बाबतीतही मी तेच केलं. आज या सर्व अनुभवांनी मी अधिक सक्षम, संतुलित आणि सकारात्मक बनलो आहे. जीवनात आलेल्या संकटांनी मला खचवलं नाही, उलट त्यांच्यामुळे मी अधिक मजबूत झालो आहे. या सर्व प्रवासात, माझ्या जवळच्या लोकांनी मला दिलेल्या आधारामुळेच मी आज या ठिकाणी उभा आहे.

- सुनील ढेपे