माझी एकच जात – माणुसकीची
गेली ३५ वर्षे पत्रकारितेत काम करताना अनेक चढ-उतार अनुभवले. केसरी, लोकमत, एकमत, लोकसत्ता, गावकरी, तरुण भारत यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांमध्ये काम केल्यानंतर २०११ मध्ये स्वतःचे "धाराशिव लाईव्ह" हे डिजिटल चॅनल सुरू केले. पत्रकारितेचा हा प्रवास केवळ व्यवसाय म्हणून नव्हे, तर समाजाप्रती असलेल्या जबाबदारीच्या भावनेतून केला आहे.
या संपूर्ण कारकिर्दीत बातमी देताना मी कधीही समोरच्या व्यक्तीची जात, धर्म, पंथ किंवा सामाजिक ओळख पाहिली नाही. बातमी म्हणजे बातमी. सत्य म्हणजे सत्य. अन्याय कुणावरही होत असेल, तर त्याविरोधात आवाज उठवणे हेच पत्रकाराचे कर्तव्य मानले. त्यामुळे अनेकदा संघर्षही करावा लागला. लोकांवर होणारा अन्याय मांडताना स्वतःवर अन्याय सहन करावा लागला. आजवर माझ्यावर पाच खोट्या केसेस दाखल झाल्या. एक प्रकरण संपले की दुसरे सुरू झाले. पण सत्याची बाजू सोडून मागे हटण्याचा विचार कधी मनात आला नाही.
परंतु आजकाल एक वेगळीच गोष्ट अनुभवायला मिळत आहे. माझ्या कामापेक्षा, विचारांपेक्षा किंवा पत्रकारितेपेक्षा काही जणांना माझी जात जाणून घेण्यात अधिक रस दिसतो. फोन करून सरळ विचारले जाते, "तुमचे आडनाव ढेपे आहे, मग तुम्ही कोणत्या गावचे?" त्यानंतर पुढचा प्रश्न असतो, "तुम्ही मराठा, लिंगायत की ब्राह्मण?"
अशा प्रश्नांमुळे मन विषण्ण होते. कारण ज्याने आयुष्यभर माणसाला माणूस म्हणून पाहिले, त्याला आज स्वतःची जात सिद्ध करण्याची वेळ येते आहे. मी त्यांना एकच प्रतिप्रश्न करतो – "बातमीमध्ये जात कुठून आली?" एखाद्या पत्रकाराच्या कामाचे मूल्यमापन त्याच्या जातीवरून का व्हावे?
माझ्यासाठी एकच जात आहे – माणुसकीची. एकच धर्म आहे – सत्याचा. एकच ओळख आहे – पत्रकाराची.
ज्या पंढरीनाथाने संतांच्या भक्तीत कधी जात-पात मानली नाही, ज्या विठ्ठलाच्या चरणी ज्ञानेश्वर, तुकाराम, चोखामेळा, सावता माळी, गोरा कुंभार, नामदेव अशा विविध समाजघटकांतील संत एकरूप झाले, त्या महाराष्ट्रात आजही जात विचारली जाते, ही शोकांतिका आहे. वारीत लाखो वारकरी एकत्र चालतात. तिथे कोणी कोणाची जात विचारत नाही. सर्वजण एकमेकांना "माऊली" म्हणतात. तिथे माणुसकीच सर्वात मोठी ओळख असते.
तंत्रज्ञानाने जग खूप पुढे गेले, शिक्षण वाढले, आधुनिकता आली; पण मनातील जात अजूनही संपलेली दिसत नाही. आपण माणसाची किंमत त्याच्या विचारांनी, कर्तृत्वाने आणि स्वभावाने करणार की जातीच्या चौकटीत अडकून राहणार?
आज माझा एकच सवाल आहे – ही जात कधी संपणार? आपण माणूस म्हणून माणसासारखे कधी वागणार?
कारण शेवटी जन्मताना कोणाची जात नसते आणि मृत्यूनंतरही ती सोबत जात नाही. मध्ये उरतो तो फक्त माणूस आणि त्याने केलेली माणुसकी.
– सुनील ढेपे
संपादक, धाराशिव लाईव्ह
