घडी बिघडली की पिढी बिघडते ...

तुळजापूर तालुक्यातील अणदूर हे माझं  मुळ गाव...येथील असंख्य लोकांचे कुलदैवत श्री खंडोबाचे आम्ही पुजारी...माझे अजोबा दत्तात्रय ढेपे यांना वडिलोपार्जित ८० एकर शेतजमिन...त्यांना सुर्यकांत, मधुकर, विश्वनाथ, अनिल अशी चार मुले...पैकी सुर्यकांत थोडेबहुत शिकले, विश्वनाथ हे डी.एड.काढून शिक्षक झाले, माझे वडील मधुकर व चुलते अनिल हे काहीच शिकले नाहीत.
शिक्षक विश्वनाथ यांना नितीन, सचिन व सुनिता अशी दोन मुले व एक मुलगी...पैकी सचिन व सुनिता हे शिक्षक झाले तर नितीन हे एम.बी.बी.एस. व पुढे एम.डी.करून डॉक्टर झाले..त्यांचे  सोलापूर व पुणे येथे मोठे हॉस्पीटल आहे...त्यांनी वैद्यकीय क्षेत्रात मोठी ख्याती प्राप्त केली आहे. ते आंतरराष्ट्रीय दर्जाचे त्वचा रोग व सौंदर्य तज्ज्ञ आहेत...ते ब-याच वेळा अनेक देशांचा परदेश दौरा करून आले..आणि देशातील विविध भागात जात असतात...
सांगायचा मुद्दा म्हणजे माझे चुलते किमान डी.एड.करून शिक्षक झाले व त्यांची तिन्ही मुले कर्तबगार निघाली...
या उलट माझे...माझे आई - वडील दोघेही अशिक्षित...कुटुंब वेगळे झाल्यानंतर माझ्या वडिलांच्या डोक्यावर मोठे कर्ज झाले...शेती पडिक पडल्यामुळे माझे आई - वडील मोल - मजुरी करू लागले..मी पाचवीत असताना गावात मुद्दाण्णा शेट्टी नावाचे गृहस्थ आले, त्यांनी अणदूरला छोटेसे उडप्पाचे हॉटेल सुरू केले...माझे वडील या हॉटेलात आचारी म्हणून काम करू लागले...त्यावेळी त्यांना दररोज एक रूपया पगार होता..
मी कशी - बशी दहावी काढली...शाळेत जाण्यासाठी वर्षभर एक अथवा दोन ड्रेस, वह्या - पुस्तकांचा वाणवा...घरातील दारिद्रय वातावरण यामुळे मला त्यावेळी केवळ दहावीला ५६ टक्के मार्क पडले..त्यावेळी डी.एड.५७ टक्काला क्लोज झाल्यामुळे माझी शिक्षक होण्याचे स्वप्न भंग पावले...माझी चित्रकला चांगली होती, पण पैश्याअभावी ए.टी.डी.लाही जावू शकलो नाही.नाईलाजास्तव नळदुर्गच्या बालाघाट महाविद्याल्यात ११ आर्टला प्रवेश घेतला...अकरावी करीत असताना आई - वडिलांना हातभार लावण्यासाठी मी अणदूरला न्यूज पेपरच्या एजन्स्या घेतल्या...पुढे वृत्तपत्रात वाचकांच्या पत्रव्यवहारातून माझ्या पत्रकारितेचा जन्म झाला...पुढे पत्रकार झालो...सध्या  प्रथितयश पत्रकार म्हणून नावलौकिक आहे...पत्रकारितेच्या क्षेत्रात उत्कृष्ट लिखाणाबद्दल २६ पुरस्कार मी मिळविले..पण पैसा काहीच कमवला नाही..मला अनेकजण टोमणे मारतात..तो पहा..परवा आलेल्या पत्रकारांने चार चाकी वाहन  घेतले..बंगला घेतला...मी माझ्या एकमतच्या दहा वर्षाच्या काळात खूप पैसा कमवू शकलो असतो, पण मी कधीही पैश्याकडे लक्ष दिले नाही...पैश्याने माणूस श्रीमंत होतो, मोठा होत नाही, हे माझे  मत आहे..
असो सांगायचा उद्देश असा की, मी थोडेफार शिकूण मोठा झाल्यामुळे माझी मुले आता चांगले शिक्षण घेत आहेत..माझी मुलगी कु. मयुरी हिला दहावीला ९३ टक्के होते तर बारवीत ८९.८३ टक्के पडले आहेत..तिच्या बारावी परिक्षेच्या काळातच तिच्या आईचे कॅन्सरचे ऑपरेशन झाल्यामुळे सी.ई.टी.ला म्हणावे तसे मार्क पडले नाहीत..पण काळजी करण्याचे कारण नाही....तिचा हव्या त्या कॉलेजला हव्या ब्रॅन्चला नंबर लागलेला आहे..माझ्या ढेपे घराण्यात ती पहिली इंजिनिअर होणार आहे..
मयुरी मला नेहमी म्हणते की, पप्पा मी कलेक्टर होणार आहे, हा फक्त बेसिक कोर्स करणार आहे.... ती कलेक्टर होईल अथवा न होईल पण तिची जिद्द व चिकाटी महत्वाची आहे...मुले गुणवंत आणि कर्तबगार निघाल्यानंतर प्रत्येक पालकांचा ऊर भरून येतो, तसेच काहीसे  माझ्या बाबतीत झाले आहे...
काही दिवसापुर्वी श्रीपतराव भोसले हायस्कूलमध्ये कु.मयुरीचा बारावी परिक्षेत चांगले मार्क घेतल्याबद्दल सत्कार झाला होता..त्यावेळी पालक म्हणून सुधीर आण्णा पाटील यांनी मला बोलण्याची संधी दिली...मी कु.मयुरीच्या यशाचे श्रेय तिच्या आईला दिले..कारण कु.मयुरीला घडविण्यात तिच्या आईचा वाटा आहे...इतके दिवस  मयुरीला शाळेतील सर्वजण शिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थी  हे पत्रकार सुनील ढेपे यांची मुलगी का म्हणून विचारत होते, मी त्यावर भाषणात म्हटले, कु.मयुरीने असे कर्तत्व करून दाखविले पाहिजे....कु. मयुरी ढेपे ही तुमची मुलगी आहे का, असे विचारले पाहिजे...या वाक्यावर सर्वांनीच टाळ्या वाजविल्या होत्या....या टाळ्या माझ्या नेहमीच आठवणीत राहतील...
मी जर अणदूरमध्येच श्री खंडोबाचा पुजारी म्हणून किंवा वडिलोपार्जित शेती किंवा व्यवसाय करीत बसलो असतो तर माझी पुढची पिढी सुधारली नसती..खरंच घडी बिघडली की पिढी बिघडते आणि सुधारली तर पुढची पिढी सुधारते....माझी आई दहा वर्षापुर्वी काविळीच्या आजाराने निधन पावली, वडील पाच वर्षापुर्वी अपघातात देवाघरी गेले, आज कु.मयुरीच्या आनंदात ते सहभागी होण्यासाठी ह्यात नाहीत, पण त्यांची आठवण आमच्या स्मरणात नेहमीच आहे...

- सुनील ढेपे