धन्यवाद आणि आभार....
पत्रकरिता पुरस्कार मिळणे, ही केलेल्या कामाची एक पावती असते. ३० वर्षे संघर्षमय पत्रकारिता करीत असताना, चार वेळा जीवघेणा हल्ला , चार वेळा खोटे गुन्हे दाखल झाले पण आजपर्यंत वेळोवेळी मिळालेले ३० हुन अधिक पुरस्कार मला सतत प्रेरणा देत राहिले...
सोलापूरचे रंगाअण्णा वैद्य आणि औरंगाबादचे अनंतराव भालेराव यांना मी जवळून पाहिले आहे. त्यांचा आदर्श माझ्या डोळ्यासमोर आहे. जीवनात अनेक संकटे आली आणि गेली पण कधीच हार मानली आहे. आयुष्यात जेवढे दुःख पाहिले तेवढा आनंदही अनुभवला. यश - अपयश याच्या कितीतरी पलीकडे मी गेलो आहे.
आयुष्यात कोणाकडून कसलीही अपेक्षा केली नाही. पत्रकारितेच्या माध्यमातून लोकांचे अनेक प्रश्न सोडवले, अनेकांची कामे केली. लोक आजही मला हक्काने आपल्या समस्या सांगतात. त्यांची कामे करण्यात मला अधिक आनंद आहे.
तसेच चांगल्या पत्रकारांच्या पाठीशी मी नेहमीच उभा राहिलो आहे. अनेकांना जॉब मिळवून दिला. पण पत्रकारितेशी गद्दारी करणाऱ्या , ढोंगी, लबाड,ब्लॅकमेल करणाऱ्या पत्रकारांची मला नेहमीच चीड आहे. भले यासाठी कोणतीही किंमत चुकवावी लागली तरी...
हे कलियुग आहे. कुणाकडून चांगली अपेक्षा करणे चुकीचे आहे.पण आपले प्रामाणिक काम करत राहणे हेच त्याला उत्तर आहे, आणि मी हेच करतोय...
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर ज्यांनी - ज्यांनी साथ दिली त्यांचे आभार. ज्यांनी त्रास दिला , त्यांचेही आभार. कारण त्यांच्यामुळे मला खूप काही शिकता आले. तुकाराम महाराज असे म्हणतात की, "निंदकाचे घर असावे शेजारी"! हे ते अशासाठी म्हणतात की निंदक जेव्हा शेजारी असतो तेव्हा तो आपल्यावर सतत पाळत ठेवून असतो आणि आपल्या अहंकाराला मधून मधून टाचणी लावून आपला फुगा फोडत असतो. म्हणजेच आपल्या परखड मूल्यमापनाला तो मदत करत असतो.
असो,मला राज्यस्तरीय चौथा स्तंभ विशेष पत्रकारिता पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन करणाऱ्या सर्वांचे अंतःकरणापासून आभार...
- सुनील ढेपे
दि. ८ मे २०२२