फाइव्ह-जीमुळं मीडियात क्रांतिकारक बदल होणार ..



दहा वर्षांपूर्वी जेव्हा मी उस्मानाबाद लाइव्ह वेबसाईट सुरु केली होती, तेव्हा इंटरनेट स्पीड 2G होती. तेव्हा स्मार्ट फोन नव्हता. वेबसाइट कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपवर दिसत होती. युट्युब होते, पण इंटरनेटची स्पीड नसल्यामुळे व्हिडिओ  पाहण्यास अडचण येत होती.तेव्हा मी एखाद्या ठिकाणी अत्यंत छोटा ब्लॅक व्हाईट टीव्ही पाहिल्यानंतर  मोबाईलवर टीव्ही चॅनल्स आणि आपली  वेबसाईट दिसली पाहिजे असे स्वप्न रंगवले होते, चार वर्षांपूर्वी हे सर्व शक्य झाले आहे.  

2 G नंतर 3 G, 4 G इंटरनेट स्पीड सुरु झाली. पुढील वर्षी  5 G सुरु होईल आणि मीडियात आणखी क्रांतिकारक बदल होतील. नेमके काय बदल होतील, हे नक्की वाचा... 


डिजिटल मीडिया...

पुर्वी वृत्तपत्र आणि पत्रकारांची मक्तेदारी होती,ती आता राहिली नाही.वाचकांना स्वतःचे मत मांडायला सोशल मीडिया पर्याय आहे.फेसबुक,टयुटर,ब्लॉग आणि व्हॉटस अ‍ॅप च्या माध्यमातून ते आपले मत जगासमोर मांडू शकतात.यु-ट्युबवर व्हिडीओ अपलोड करून जगासमोर ते येवू शकतात.आज प्रत्येक जिल्ह्यात,तालुक्यात न्यूज पोर्टल सुरू झाले आहे.अनेकांनी यू ट्युब चॅनल सुरू केले आहे.यामुळे प्रस्थापित वृत्तपत्रे आणि चॅनलची मक्तेदारी संपुष्टात आली आहे.फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून तुम्हाला हव्या असलेल्या प्रकरणाचा पर्दाफाश करू शकता किंवा आपले मत मांडू शकता. 


कोरोना लॉकडाऊनमुळे जाहिरात व्यवसाय ४० ते ५०  टक्के घटला आहे.त्यामुळे वृत्तपत्रे आणि चॅनल अधिक अडचणीत आले आहेत.येत्या पाच वर्षात अनेक वृत्तपत्रे बंद पडतील.त्याची जागा ई -पेपर घेतील.अमेरिकासारख्या प्रगत देशात आता वृत्तपत्रे छापली जात नाहीत,वाचकांना ई-पेपर वाचावा लागतो.काही ठराविक रक्कम भरून युझर नेम आणि पासवर्ड घ्यावा लागतो आणि ई- पेपर वाचता येतो.तीच पध्दत आपल्या देशात येईल.याला किमान पाच वर्षे लागतील.पण येणारा काळ प्रिंट मीडियासाठी अवघड आहे.


उस्मानाबादसारख्या ग्रामीण भागात सन 2011 मध्ये मी उस्मानाबाद लाइव्ह या ऑनलाईन न्यूज पोर्टलची सुरूवात केली होती.त्याच वर्षी सोलापूर विद्यापीठातील वृत्तपत्र विद्या विभागात मला गेस्ट लेक्चर म्हणून मला बोलावण्यात आले होते.त्यावेळी मी येणारा काळ प्रिंट मीडियासाठी अवघड असून वृत्तपत्रांची जागा ई- पेपर घेतील,असे विधान केले होते.

http://www.dhepe.in/2011/03/

त्यावेळी माझ्या या विधानाची अनेकांनी मस्करी केली होती.काहींनी टींगल केली होती.आता टींगल करणारे तेच विधान करू लागले आहेत.जाहिरात व्यवसाय कमी झाल्यानेे सर्वच मोठ्या वृत्तपत्रात कॉस्ट कटींग सुरू आहे.त्यात मजिठीया आयोगाचा बडगा येत असल्याने मालक मंडळी बैचेन आहे.त्यांना आता 45 वयाच्या पुढे पत्रकार नको आहे.त्यामुळे ज्यांनी 25 ते 30 वर्षे मीडियात घालवली त्यांना उतारवयात नेमके काय करावे हा प्रश्‍न पडलेला आहे.चांगले लिहिणारे अनेक संपादक आणि पत्रकार सध्या जॉब नसल्याने बसून आहेत.अनेक जुन्या पत्रकारांना हातात माऊस पण धरता येत नाही.त्यांच्यासाठी काळ अवघड आहे.

मीडीयात टिकायचे असेल तर कॉम्प्युटर.डीटीपी,पेजीनिअशन,इंटरनेट आणि सोशल मीडियाचे ज्ञान हमखास हवे.बातमी जशी चांगली लिहिता आली पाहिजे तसे आता सर्व संगणक ज्ञान पाहिजे.तरच तुम्ही या क्षेत्रात टीकाल...नाही तर तुमच्यासाठी मीडियाची दारे बंद झाली म्हणून समजा...


फाइव्ह-जीमुळं काय होणार ?


  • > निरंतर कव्हरेज, अधिक गती, व्हिडिओंची अधिक सुधारित गुणवत्ता, अधिक डेटा पाठवण्याची आणि मिळविण्याची संधी, अधिक विश्‍वसनीयता आणि संपर्काच्या विविध पैलूंमध्ये कमी विलंब अशा अनेक गोष्टी शक्य होतील.
  • > अभिनवतेला चालना मिळेल आणि आपल्या दैनंदिन जीवनामध्ये बदल घडू शकेल. फाइव्ह-जीमधला डेटा स्पीड तब्बल १० जीबीपीएसपर्यंत जाऊ शकतो, असा अंदाज.
  • > ऑनलाईन उपलब्ध असलेला कंटेट किंवा आशय यामध्ये आमूलाग्र बदल.
  • > फाइव्ह-जी नेटवर्क इंटरनेट ऑफ थिंग्जसह ऑटोमोटिव्ह, आरोग्यसेवा, शेतीविषयक तंत्रज्ञान, शैक्षणिक सुविधा आणि उत्पादन या उद्योगांमधलं सर्वांत पसंतीचं तंत्रज्ञान म्हणून पुढं येईल.
  • > हँडसेट्सच्या बॅटरीचं आयुष्य याआधी कधीच पाहिलं नव्हतं एवढा काळ टिकू शकेल


प्रिंट आणि टीव्ही मीडियावर होणार परिणाम

प्रिंट आणि टीव्ही मीडियाला सध्या घरघर लागली आहे. 5 G सुरू झाल्यानंतर ही घरघर अधिक वाढेल . वृत्तपत्राची जागा ऑनलाइन न्यूज पोर्टल आणि ईपेपर घेतील तर टीव्हीची जागा युट्युब, HOTSTAR , JIO सारखे अँप घेतील.

  • >  वृत्तपत्र काढण्यासाठी लागणारा खर्च आणि येणारे उन्पन्न याचा कुठेच ताळमेळ बसत नाही. त्यात कागदाचे भाव दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. कमी झालेल्या पानाची संख्या त्याचेच द्योतक आहे. घरोघरी वृत्तपत्र वाटणाऱ्याची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे.त्यात स्मार्ट फोनचा वापर वाढल्याने वृत्तपत्र वाचणाऱ्यांची संख्या कमी होत आहे. त्यामुळे सर्व वृत्तपत्रांचे खप घसरले आहेत. तसेच जाहिरातदार हा वृत्तपत्रात जाहिरात देण्याऐवजी ऑनलाइन जाहिरात करत असल्याने वृत्तपत्रांतील जाहिरातीचे प्रमाण कमी होत आहे.वृत्तपत्रांत जाहिरात देण्यासाठी जेवढा खर्च येतो त्याच्या १० टक्के खर्चात जाहिरात होत असेल तर जाहिरातदार ऑनलाइन जाहिरात करेल. परिणामी येत्या काही वर्षात अनेक वृत्तपत्रे बंद पडतील.


  • >  टीव्ही न्यूज चॅनल सुरु करण्यासाठी प्रचंड खर्च येतो. विशेष म्हणजे त्याचे प्रक्षेपण करण्यासाठी एका DTH वर एक वर्षाला किमान एक कोटी खर्च लागतो. गावोगावचे केबल चालकही आता पैसे मागत आहेत. सर्व DTH आणि केबलवर प्रक्षेपण करण्यासाठी वर्षाला किमान १० कोटी खर्च लागतो. स्टुडिओ भाडे, कर्मचाऱ्यांच्या पगारी आणि अन्य खर्च वेगळा. त्यामुळे आहे ते चॅनल बंद पडतील आणि त्याची जागा युट्युब, HOTSTAR , JIO सारखे अँप घेतील.


  • > 5 G सुरु झाल्यानंतर वेबसाइट, अँप, युट्युब आणि सोशल मीडिया अधिक गतिमान आणि वेगवान होईल.लोकांना लाइव्ह दृश्ये म्हणजे व्हिडीओ पाहण्यात अधिक इंटरेस्ट आहे. 5 G मुळे व्हिडीओ अधिक गतिमान आणि HD पाहता येतील. स्मार्ट फोनवर व्हिडिओ कॉन्फरन्स HD दिसेल. तसेच फेसबुक लाइव्ह पण HD दिसेल. आपल्या गावात जर एखादा कार्यक्रम असेल तर लोक ते सोशल मीडियावर लाइव्ह करतील. व्हाट्स अँप वर व्हिडिओ HD दिसतील. लोक आपल्या गावातील व्हाट्स अँपग्रुप वर कोणताही कार्यक्रमाचा व्हिडीओ शेयर करत असतील तर उद्या छापणाऱ्या प्रिंट मिडीयातील बातम्या कश्याला वाचतील ? आपल्या गावाची बातमी टीव्हीवर येत नसेल तर टीव्ही लोक का म्हणून पाहतील ?


  • > आजची बातमी उद्या कश्याला ? आजची बातमी आज नव्हे आताच यामुळे लोकांचा कल डिजिटल मीडियाकडे वाढत चालला आहे. भविष्यात तो अधिक वाढेल. त्यामुळेच साखळी वृत्तपत्रे सुद्धा डिजिटल मीडियावर लक्ष केंद्रित करत आहेत.

- सुनील ढेपे

उस्मानाबाद - पुणे