5 G सुरु झाल्यानंतर मीडियात मोठी क्रांती होणार – ढेपे

नवी मुंबई - येत्या दोन वर्षात 5 G सुरु होईल, त्यावेळी मीडियात मोठी क्रांती होईल. अनेक वृत्तपत्रे बंद पडून त्याची जागा ईपेपर घेतील तर टीव्ही चॅनल्स बंद पडून ओटिटी चॅनल्स सुरू होतील, असे प्रतिपादन पुण्याचे ज्येष्ठ पत्रकार सुनील ढेपे यांनी येथे केले.
नवी मुंबईतील कोकण भवन मध्ये विभागीय माहिती कार्यालयाच्या वतीने माहिती कार्यालयातील कर्मचाऱ्यांसाठी कार्यशाळा पार पडली, यावेळी डिजिटल मीडिया व होणारे बदल या विषयावर ढेपे बोलत होते.यावेळी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक डॉ दिलीप पांढरपट्टे, उपसंचालक डॉ. गणेश मुळे, युवा पत्रकार हर्षल भदाणे आदी उपस्थित होते.

कागदाचे वाढलेले भाव, होणारा खर्च आणि येणारे जाहिरात उत्पन्न याचा कुठेच ताळमेळ बसत नाही. त्यात घरोघरी वाटप करणाऱ्या वितरकांनी संख्या कमी होत आहे. त्यामुळे वृत्तपत्र व्यवसाय अडचणीत आला आहे. त्यामुळे भविष्यात अनेक वृत्तपत्रे बंद पडतील, त्याची जागा ईपेपर घेतील. मात्र ईपेपर वाचण्यासाठी वाचकांना पैसे मोजावे लागतील. टीव्ही न्यूज चॅनल्स डीटीएच कंपन्या आणि केबल्सच्या वितरण खर्चामुळे अडचणीत आले आहेत. त्यामुळे ओटिटी चॅनल्स सुरु होतील. त्याची सुरुवात सकाळ माध्यम समूहाने सुगरण चॅनल सुरु करून केल्याचेही ढेपे यांनी यावेळी सांगितले.

गेल्या दहा वर्षात डिजिटल मीडियात काय बदल झाले, 5 G सुरु झाल्यांनतर आणखी काय बदल होतील याचा ऊहापोह ढेपे यांनी सांगून भविष्यात न्यूज बेबसाईट, मोबाईल अँप, युट्युब चॅनल्स, सोशल मीडिया याचा दबदबा कसा राहील, यावर भाष्य केले.

माहितीच्या क्षेत्रात सातत्याने बदल होत आहेत. आज कॅमेरा युगाचा अस्त होत असुन मोबाईल युग सुरु झाले आहे.ही एक नवीन क्रांती असुन या बदलत्या तंत्रज्ञानाचा वापर दैनंदिन कामकाजात करुन माहिती विभागाने अद्ययावत व्हावे असे प्रतिपादन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक डॉ दिलीप पांढरपट्टे यांनी केले. कार्यशाळेचे सुत्रसंचालन ठाण्याच्या जिल्हा माहिती अधिकारी मनिषा पिंगळे यांनी केले. तर आभार प्रदर्शन माहिती अधिकारी राहुल भालेराव यांनी केले.


                                                                                                                     (26/02/2020)