मागे वळून पाहताना ...

तुळजापूर तालुक्यातील अणदूर हे माझे गाव.अणदूरचे ग्रामदैवत श्री खंडोबाचे आम्ही पुजारी.माझ्या आजोबाला एकूण 80 एकर  शेतजमिन.त्यांना चार मुले.त्यामुळे माझे वडील मधुकर ढेपे यांना एकूण 20 एकर शेतजमिन वाट्याला आली,त्यातील फक्त तीन एकर जमिन बागायत आणि बाकीची 16 एकर जमिन माळरान आणि खडकाळ.पावसावर अवलंबून.या 16 एकरमध्ये चार पोती ज्वारी पिकणे मुश्कील.माझ्या लहानपणीच शेतजमिनीच्या वाटण्या झालेल्या.आजोबाला एक चिरेबंदी वाडा होता,त्यात चार तुुकडे पडले.समोरचे अंगण माझ्या वडीलांना मिळाले.त्या अंगणात   मातीची एक खोली बांधली,त्यावर पत्रे आणि बाजूला झोपडी बांधली.पावसाळ्यात घर गळत असे.घरात वीज नव्हती.दिवा लावून आमचा संसार सुरू होता.माझ्या वडीलांना एकूण दोन मुले आणि एक मुलगी.लहानपण अत्यंत गरीबीत गेले.दोन वर्षातून एकदा दुष्काळ पडल्याने माझे वडील कर्जबाजारी झाले.शेतकर्‍यांचे शेतमजूर झाले.घरप्रपंच भागवण्यासाठी त्यांना हॉटेलात काम करावे लागले,त्यातून ते आचारी बनले.लग्नाचा किंवा मुंजीचा उत्तम स्वयंपाक करणारे ते या भागातील आचारी बनले.पण काही सिजनमध्येच वडीलांना काम मिळत असे.
घराजवळच श्री खंडोबा मंदिर असल्यामुळे मी अभ्यासासाठी आणि झोपण्यासाठी देवळात जात असे.देऊळ हाच माझा आसरा बनला,याच देवळात अणदूूरचे जवाहर विद्यालय सुरू होेते आणि आजही आहे.त्यावेळी शाळेच्या खोलीमध्ये फरश्या नव्हत्या.शिपाई दर  रविवारी शेणाने सारवण करीत असत.मंदिराच्या आवारातही मातीच होती.नंतर आता फरशीकाम करण्यात आले आहे.पाऊस सुरू झाला की मंदिरातही पावसाच्या सरी येत असत.त्यात काळ्या मुंग्याचा त्रास.अनेक रात्री आम्ही जागून काढत असत.
माझे आजोळ बेंबळी.दत्तात्रय रेडेकर हे माझे आजोबा.दिवाळी सुट्टी आणि उन्हाळी सुट्टी मी बेंबळीमध्येच घालवत असे.मोटे घराण्यात माझी मोठी आत्या होती.तिने आणि माझ्या आजोळच्यांनी खूप प्रेम केले.त्यावेळचे मला मिळालेले सवंगडी खूप प्रेम करणारी होती.त्या आठवणी आल्या की मन कसे ओलेचिंब होते.रेडेकर आणि मोटे घराण्याचा मी सदैव ऋणी आहे.
माझ्या आईकडील आजोबांनी आमच्या उपजिवीकेसाठी आम्हाला त्यांच्याकडील एक म्हैस दिली.आई शेतात म्हैशीचा सांभाळ करत असे.वडील हॉटेलात काम करत असत.मीही मिळेल ती कामे करीत असे.रविवारच्या सुट्टीच्या दिवशी द्राक्षाच्या बागांना औषध फवारणी असो की विहिरीचे गाळ काढण्याचे काम असे,ते मी करत असत. माझे वडील ज्या हॉटेलमध्ये काम केले तेथेही मी अनेक वेळा काम केले आहे. दिवसभर कामाचे फक्त ३ रुपये मिळत असत. पण सकाळी मोफत नाष्टा  मिळतो म्हणून हे काम करीत असे.त्यातून मी शाळेचा आणि वैयक्तीक खर्च भागवत असे.वडीलांना 48 दिवसांला श्री खंडोबाचा पुजेचा वार येत असे,त्यावेळी खंडोबा मंदिरात भाविकांना भंडारा लावण्यासाठी मी बसत असत.त्यातून थोडेफार पैसे मिळत होते.माझे कसेबसे दहावी पर्यंत शिक्षण झाले.दहावीनंतर मीही गावात काही पेपरच्या एजन्सा घेतल्या,घरोघरी पेपर टाकण्याचे काम सुरू केले.ते करत बातम्या वाचून बातम्या लिहिण्यास शिकलो.त्यातूनच माझ्या पत्रकारितेचा जन्म झाला.केसरीचा अणदूर वार्ताहर म्हणून तीन वर्षे काम केले.
खरं तर मला चित्रकलेची खूप आवड.मी सर्व चित्रकलेच्या परिक्षा पास झालो होतो.आलूरे गुरूजी जेव्हा निवडणुकीला उभे असत तेव्हा भिंतीवर जाहिराती  करण्याचे काम पोतदार गुरूजींच्या मार्गदर्शनाखाली करत असत.मला त्याचे कधीच पैसे मिळाले नाहीत पण काही तरी शिकण्याची जिद्द होती.पैसे अभावी चित्रकलेच्या पुढील कोर्सला जावू शकलो नाही.होणार होतो चित्रकार पण झालो पत्रकार.
अणदूरला असताना अणदूरचे फुलचंद घुगे खून प्रकरण आणि चिवरी यात्रेतील पशुहत्या हे दोन विषय गाजले आणि या भागात नामांकित वार्ताहर म्हणून माझा लौकीक झाला.वयाच्या 22 व्या वर्षी लोकमतचा पां.वा.गाडगीड पुरस्कार मिळाला.हा माझा पहिला पुरस्कार.बारावीनंतर बाहेरून कॉलेज केले.बाकी वेळेत मिळेल ती कामे केली.1990 ला पदवी घेतली आणि एम.एम.साठी लातूर गाठले.केसरीचा लातूर जिल्हा प्रतिनिधी म्हणून  सहा महिने काम केल्यानंतर लोकमतमध्ये संधी मिळाली पण एक वर्षातच विलासरावांचा एकमत निघाला आणि एकमतचा उस्मानाबाद जिल्हा प्रतिनिधी म्हणून 20 ऑगस्ट 1991 ला उस्मानाबादला आलो.याच वर्षी औरंगाबाद लोकमतचे चिफ रिर्पाटर स.सो.खंडाळकर यांच्या भगिनी महानंदाशी माझा विवाह झाला.
तब्बल 9-10 वर्षे एकमतमध्ये काम केल्यानंतर काही कारणास्तव एकमत सोडावे लागले.त्यानंतर लोकसत्ताचे काम मिळाले.सोलापूरहून सायं दैनिक सह्याद्री सुरू झाल्यानंतर तो गाजवला.याच दरम्यान व्यवयायात पडलो,व्यवसाय सांभाळत पत्रकारिता सुरूच होती.स्वाभिमानी स्वभावामुळे काम करताना अनेक ठिकाणी अडचणी आल्या पण कधी स्वाभिमान सोडला नाही.
गाडी थोडी रूळावर आली तर सन 2000 मध्ये आई काविळीने गेली.त्यानंतर सन 2004 मध्ये वडील अपघातात गेले.तर 2012 मध्ये पत्नी महानंदा कॅन्सरने गेली.
एकामागून एक कौटुंबिक आघात झाले.माझ्या आईवडिलांची वृध्दापकाळात सेवा करण्याची संधी काळाने माझ्यापासून हिरावून घेतली.माझे यश पाहण्यासाठी माझे आईवडील नाहीत याचे मला सतत दुःख वाटते.बाहेरचे आघात मी कितीही सहन करू शकतो,पण हा कौटुंबिक आघात मी सहन करू शकत नाही.पत्नीचे अकाली जाणे तर फार दुःखद आणि क्लेशधारक झाले होते.त्यानंतर पुण्याच्या लोखंडे कुटुंबाने आपलेसे केले.याच घराण्याशी माझे नाते जुळले.पुण्यात त्यांचाच मोठा आधार आहे.
त्यात गतवर्षी याच दरम्यान आलेले सुनामी संकट माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी हादरा देणारे होते.केवळ विरोधात बातमी दिली म्हणून कार्यालयावर हल्ला करण्यात आला.कोणताही गुन्हा केला नसताना उलट माझ्यावरच खोटी केस करण्यात आली.6 सप्टेंबर रोजी सायंकाळी अटक झाली.10 दिवस पोलीस कोठडी झाली.16 सप्टेंबरला एमसीआर ( न्यायायालीन कोठडी ) झाला.त्यामुळे गतवर्षीचा वाढदिवस सकाळी पोलीस कोठडी,दुपारी कोर्ट आणि रात्र जेलमध्ये असा गेला.गतवर्षी मुलीला जॉब लागल्यामुुळे वाढदिवस छानपैकी करण्याचा बेत होता.पण जणू काही दृष्टच लागली होती.
मी 27 वर्षापासून पत्रकारितेत कार्यरत आहे.आतापर्यंत उत्कृष्ट लिखाणाबद्दल 27 पेक्षा जास्त पुरस्कार मिळाले आहेत.अनेक ठिकाणी काम करण्याची संधी मिळाली,त्या संधीचे सोनेच केले आहे.मात्र कधी ऊन,कधी सावली,कधी चढ तर कधी उतार आले.आतापर्यंत कोणत्याही संकटाला घाबरलो नाही.कायम लढत आलो आहे.कितीही संकटे आली तरी फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून उठून पुन्हा आकाशात उडालो आहे.संकटावर नेहमीच पाय देत आलो आहे.हे बळ मिळते ते केलेल्या चांंगल्या कर्मामुळे.
पत्रकारितेच्या माध्यामातून अनेकांना मदत केली आहे.लेखणीच्या जोरावर त्यांना न्याय मिळवून दिला आहे.अनेकांना माझ्या परीने मदत केली आहे.त्यांचेच आशिर्वाद आणि सदिच्छा माझ्या कामी आल्या.अनेकांनी जाणीवपुर्वक त्रास दिला.काहीही मदत केली.सगळेच चांगले किंवा सगळेच वाईट नसतात.ज्यांनी त्रास दिला त्यांच्याबद्दल सुध्दा आता माझी तक्रार नाही,त्यांना देव आता तरी सद्बुध्दी देवो !
आजपर्यत ज्यांनी माझ्यावर भरभरून प्रेम केले त्यांचा मी सदैव आभारी आहे.माझ्या संकटकाळात मदत करणार्‍यांचा सदैव ऋणी आहे.माझ्या वाढदिवसांनिमित्त शुभेच्छा देणार्‍यांना धन्यवाद देतो.आपल्या शुभेच्छा माझ्यासाठी प्रेरणादायी आहेत.पुढे  काम करण्यास बळ देणार्‍या आहेत.आपल्या सदिच्छांच्या जोरावरच पुढील वाटचाल सुरू आहे.
त्या प्रकरणानंतर मला नाईलजास्तव उस्मानाबाद सोडावं लागलं,पुण्यात यावं लागलं,याची मला नक्कीच खंत आहे.पण जरी पुण्यात असलो तरी सारे लक्ष उस्मानाबादकडं असतं.पुण्यात बसून आजही उस्मानाबादच्या बातम्या दिल्या आहेत.भविष्यात अनेक योजना आहेत.आपल्या आशिर्वादामुळे आणि सदिच्छामुळे त्या नक्की पुर्ण होतील.
जोपर्यत जीवंत आहे.तोपर्यंत लिहित राहीन.पत्रकारितेच्या माध्यमातून लोकांची सेवा करीत राहीन.निर्भीड,निष्पक्ष आणि सडेतोड पत्रकारितेचे जो बाणा आहे,तो शेवटपर्यत कायम ठेवेन.कोणापुढे झुकणार नाही की लाळ घोटणार नाही.सत्य ते लिहिन आणि सत्य तेच बोलेन हेच यानिमित्त अभिवचन देतो.घेतला वसा कधी सोडणार नाही.
महामानव ,भारतरत्न  डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले आहे की,चार दिवस शेळी होेवून जगण्यापेक्षा एक दिवस वाघ होवून जगा.कोणाचा गुलाम होवू नका.होय मी तेच करतोय.
पुनश्‍च सर्वांचेे आभार.

सुनील ढेपे
संपादक,उस्मानाबाद लाइव्ह
मो.7387994411
व्हॉटस् अ‍ॅप -9420477111
वेबसाईट -
www.osmanabadlive.in
www.dhepe.in