मागे वळून पाहताना...

बघता - बघता आज आयुष्याचे ४३ वर्षे पुर्ण केले.अजून हाफ सेंच्युरी सुध्दा मारली नाही.पण मला अकाली प्रौढत्व आले आहे.आयुष्यात जेवढे मोठे यश मिळाले,तेवढीच मोठी संकटे,दु:ख आणि वेदना सहन कराव्या लागल्या,पण यशाने कधी हूरळून गेलो नाही की दु:ख आणि संकट आले म्हणून कधी खचलो नाही.आयुष्यात तत्वाशी कधी तडजोड केली नाही,मी तत्वाशी ठाम राहिलो म्हणून काही वेळा संकटे आणि दु:ख सहन करावे लागले,हे आता कळून चुकले आहे पण हरलो नाही याचे समाधान वाटले.सत्य परेशान हो सकता है,लेकिन पराजित नही,हेच खरे.
आयुष्यात अनेक संकटे पाहिली पण १ मार्च २०१२ रोजी आलेले संकट कधीच विसरू शकत नाही.त्या संकटाने पार उद्ध्वस्त, हबकून आणि हरवून गेलो होतो.पण परमेश्वर कोणाची जागा कोणासाठी तरी तयार करून ठेवतो,हेच खरे.मुलांची देवकी जरी हरपली असली तरी यशोदा त्यांना मिळाली आहे.या यशोदाने आयुष्याला नविन फुंकर घालून दिली आहे.त्यामुळे पुन्हा जगायला शिकलो आहे.कितीही संकटे आली तरी हरायचे नाही किंवा रडायचे नाही,लढायचे हे शिकलो आहे.
तुळजापूर तालुक्यातील अणदूर हे माझे गाव.मला वयाच्या चौथ्या वर्षी शाळेत घालण्यात आले.त्यावेळी बालवाडी नव्हती.पहिलीत प्रवेश देताना मास्तरांनी अंदाजे जन्मतारीख लिहिली आणि तीच माझी जन्मतारीख झाली.माझी जन्मतारीख लिखित स्वरूपात कुठे अजून तरी सापडली नाही.कारण माझे आई - वडील अशिक्षित होते.आई - वडील अशिक्षित होते पण त्यांचे संस्कारच मला कधी तत्वाशी तडजोड करू देत नाहीत.
वयाच्या १७ व्या वर्षी पत्रकारितेत आलो.२१ व्या वर्षी लग्नाच्या बेडीत अडकलो होतो.२२ व्या वर्षी बाप झालो,त्यामुळेच अकाली प्रौढत्व आले आहे.गरीबी परिस्थितीवर मात करीत एम.ए.बी.जे.शिक्षण पुर्ण केले.लोकमत,एकमत,लोकसत्तानंतर आता भास्करसारख्या नामांकित दैनिकात काम करण्याची संधी मिळाली आहे.न्यूज एक्स्प्रेसच्या निमित्ताने इलेक्ट्रॉनिक मीडियातही काम करण्याची संधी मिळाली.गेल्या चार वर्षापासून उस्मानाबाद लाइव्ह (www.osmanabadlive.com ) हे न्यूज पोर्टल सुरू आहे.
आजपर्यंत पत्रकारितेतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल राज्य पातळीवरील २५ आणि विभागीय पातळीवरील १० असे ३५ हून अधिक पुरस्कार मिळाले आहेत.गेल्या चार- पाच वर्षापासून मी कुठे पुरस्कारासाठी प्रवेशिका पाठवत नाही किंवा कोणी पुरस्कार देतो म्हटले तरी नम्रपणे नाकारतो.कारण पत्रकारितेत आलेल्या नव्या तरूणांना संधी मिळावी हा त्यामागील उद्देश आहे.
मी पत्रकारितेत कसा आलो,आजपर्यंत कोणकोणती प्रकरणे गाजवली हे माझ्या या http://muktrang.blogspot.in ब्लॉगवर सविस्तर वाचू शकता.अणदूरचे फुलचंद घुगे प्रकरण,चिवरीची पशुहत्त्या,सास्तूरचे नरबळी प्रकरण,जवळा खुर्द नरबळी प्रकरण,१९९३ ला झालेल्या प्रलयकारी भूकंपाचे १ महिना ऑल द स्पॉट केलेले वार्तांकन,वन विभागातील चंदन चोरी प्रकरण आदी किती तरी प्रकरणे गाजवली.
ज्यावेळी मी पत्रकारितेस सुरूवात केली त्यावेळी फॅक्स यंत्र सुध्दा नव्हते.हाताने बातम्या लिहून टपालाने पाठवाव्या लागत होत्या.नंतर फॅक्स,नंतर ई- मेल आणि आता तर डायरेक्ट पेज लावून पाठवण्याची संकल्पना आली.ई - मेल,फेसबुक आणि व्हॉटस् अ‍ॅप्सच्या जमान्यात पत्रकारिता आता सोपी झाली पण पत्रकार थोडे आळशी झाले,ही खंत कधी कधी लागून राहते.ऐकीव माहितीवर ब्रेकिंग न्यूज चालवली जाते,याचा खेदही वाटतो.पण असो...
आजच्या वाढदिवसानिमित्त ज्यांनी - ज्यांनी शुभेच्छा दिल्या,त्या सर्वांचे पुन्हा एकदा आभार.असेच प्रेम,स्नेह आणि सदिच्छा कायम राहोत,ही अपेक्षा.

आपला
सुनील ढेपे
9420477111